महाराष्ट्राच्या अनेक भागांत सलग मुसळधार (Heavy Rain) पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः मुंबई, नांदेड, रत्नागिरी, लातूर या जिल्ह्यांत पावसाचा तडाखा बसला असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल ट्रेन व रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर नांदेडमध्ये मध्यरात्री झालेल्या ढगफुटीसमान पावसाने पाच नागरिकांचा जीव गेला आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात Heavy Rain – दरड कोसळली
आंबा घाट परिसरात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. त्यामुळे पुणे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून काही ठिकाणी वाहतूक वळविण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने कोकण व पश्चिम महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबईतील दुर्घटना
मुंबईत अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) अनेक दुर्घटना घडत आहेत. चेंबूर भागात एका संरक्षण भिंतीच्या कोसळण्याने सात झोपड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय शहरातील अनेक ठिकाणी इमारतींच्या तळ मजल्यात पाणी साचले असून रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
लोकल ट्रेन सेवेत अडथळे
मुंबईतील लोकल ट्रेन सेवा पावसामुळे विस्कळीत झाली आहे. सकाळपासून लोकल गाड्या सुमारे अर्धा तास उशिराने धावत आहेत. विशेषतः हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर विलंब मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रस्त्यांवरही पाण्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
माटुंगा पोलिसांची तत्पर मदत: पावसात अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांची सुटका
मुंबईतील मुसळधार पावसामुळे किंग्स सर्कल परिसरातील पुलाखाली पाणी साचले असता एका शाळेची बस बंद पडली. या बसमध्ये लहान मुलं अडकली होती. मात्र, वेळेवर धाव घेत माटुंगा पोलिसांनी बसचालक आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले.नंतर मुलांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना सुरक्षितपणे सुपूर्त करण्यात आले.
मुंबई पोलिसांच्या या तत्पर आणि संवेदनशील कारवाईमुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याची प्रशंसा केली जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अतिवृष्टीसंदर्भात आढावा बैठक
महाराष्ट्रातील विविध भागांत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या (Heavy Rain) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय नियंत्रण कक्षात सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. दुपारी २ वाजता झालेल्या या बैठकीत पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती, बचाव व मदतकार्याची गती, तसेच जिल्हा प्रशासनाकडून घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सतत नागरिकांच्या संपर्कात राहून तातडीने मदत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या. तसेच एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस व स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय राखत पूरग्रस्त भागांतील लोकांचे जीव व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
या बैठकीत हवामान खात्याच्या ( Imd Heavy Rain Alert ) इशाऱ्यांचा विचार करून पुढील काही दिवसांसाठी आवश्यक खबरदारी घेण्यावरही भर देण्यात आला.
राज्यभरात मुसळधार पावसामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नद्या-ओढ्यांच्या तीरावर जाणे टाळावे असे आवाहन केले आहे.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई-ठाण्यात जलसंचय वाढला – Imd Heavy Rain Alert
