INS Taragiri आणि INS Aridhaman – भारताच्या सागरी सुरक्षेला मोठी चालना देणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण घडामोडी आज समोर आल्या आहेत. भारताने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित तिसरी अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS Aridhaman भारतीय नौदलात दाखल केली आहे. ही पाणबुडी देशाच्या सामरिक प्रतिरोधक क्षमतेत (Strategic Deterrence) मोठी भर घालणारी ठरणार असून, भारताच्या अणु त्रिस्तरीय संरक्षण व्यवस्थेला अधिक बळकटी देणार आहे. यामुळे भारताची समुद्रातील दीर्घकालीन संरक्षण क्षमता आणि शत्रूला रोखण्याची ताकद अधिक मजबूत झाली आहे. याचबरोबर, राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट INS Taragiri चे भव्य समारंभात उद्घाटन (Commissioning) करण्यात आले. सुमारे ६,६७० टन वजनाची ही युद्धनौका ‘प्रोजेक्ट 17A’ अंतर्गत तयार करण्यात आली असून, तिची रचना वॉरशिप डिझाइन ब्युरोने केली आहे आणि Mazagon Dock Shipbuilders Limited या कंपनीने तिची बांधणी केली आहे. विशेष म्हणजे, या जहाजामध्ये ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा समावेश असून, देशातील २०० हून अधिक MSMEs चा यात सहभाग आहे.

अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट INS Taragiri
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, INS Taragiri ही केवळ एक युद्धनौका नसून भारताच्या वाढत्या तांत्रिक क्षमतेचे, आत्मनिर्भरतेचे आणि सागरी शक्तीचे प्रतीक आहे. ही नौका उच्च वेगाने प्रवास करू शकते आणि दीर्घकाळ समुद्रात तैनात राहू शकते. आधुनिक रडार, सोनार आणि BrahMos सारख्या प्रगत क्षेपणास्त्र प्रणालींनी सुसज्ज असलेली ही युद्धनौका युद्ध, दहशतवादविरोधी कारवाई, समुद्री चाच्यांविरोधातील मोहिमा, किनारपट्टी संरक्षण आणि मानवतावादी मदत अशा विविध भूमिकांमध्ये सक्षमपणे कार्य करू शकते.
भारताच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. भारताची सुमारे ११,००० किलोमीटर लांबीची किनारपट्टी आणि ९५ टक्के व्यापार समुद्रमार्गे होत असल्यामुळे मजबूत नौदल उभारणे ही काळाची गरज असल्याचे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. त्यांनी असेही सांगितले की, भारतीय नौदल सतत हिंद महासागर क्षेत्रात सक्रिय राहून व्यापारी जहाजे, तेल टँकर्स आणि महत्त्वाच्या समुद्री मार्गांचे संरक्षण करत आहे.
INS Aridhaman – स्वदेशी अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी
INS Aridhaman ही भारताची तिसरी स्वदेशी अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (SSBN) असून, देशाच्या अणु-प्रतिबंधक क्षमतेत (nuclear deterrence) मोठी भर घालणारी अत्यंत महत्त्वाची युद्धसज्ज साधन आहे. ‘अरीहंत’ श्रेणीतील ही प्रगत पाणबुडी भारतीय नौदलाच्या ‘त्रिस्तरीय अणु प्रतिकार क्षमते’चा (nuclear triad) एक अत्यावश्यक भाग आहे, ज्यामुळे भारताला जमिनीवरून, हवाई मार्गाने आणि समुद्रातून अण्वस्त्र प्रत्युत्तर देण्याची क्षमता प्राप्त होते. INS Aridhaman ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून, दीर्घकाळ समुद्रात गुप्तपणे कार्यरत राहण्याची क्षमता तिच्यात आहे, ज्यामुळे शत्रूला तिचा मागोवा घेणे अत्यंत कठीण ठरते.
या पाणबुडीमध्ये लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची तैनाती करण्याची क्षमता असून, ती देशाच्या सुरक्षेसाठी विश्वासार्ह ‘दुसऱ्या प्रहाराची क्षमता’ (second-strike capability) सुनिश्चित करते. स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून विकसित करण्यात आलेली आय एन एस आरिधमन ही ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने एक मोठी झेप मानली जाते. तिच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची ताकद आणि धोरणात्मक सज्जता अधिक बळकट झाली असून, जागतिक स्तरावर भारताची सागरी व संरक्षणात्मक क्षमता अधिक प्रभावीपणे अधोरेखित झाली आहे.
डिजिटल युगात समुद्राखालील इंटरनेट केबल्सचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे केवळ पारंपरिक सुरक्षेपेक्षा व्यापक दृष्टिकोन ठेवून समुद्री सुरक्षा मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. INS Taragiri सारख्या अत्याधुनिक युद्धनौका या दृष्टीने भारताला भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करत आहेत.
एकंदरीत, आय एन एस आरिधमन पाणबुडी आणि आय एन एस तरागिरी युद्धनौकेच्या समावेशामुळे भारताची सागरी ताकद अधिक भक्कम झाली असून, भारत जागतिक पातळीवर एक जबाबदार आणि सक्षम सागरी शक्ती म्हणून अधिक ठामपणे उभा राहत असल्याचे स्पष्ट होत आहे.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
